Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवरायांचे मावळे दर्यावीर मायनाक भंडारी

        दर्यावीर मायनाक भंडारी

छत्रपती शिवरायांना स्वराज्यासाठी कोकणातून अमुल्य अशी रत्ने मिळाली. स्वराज्यासाठी जीव देणारी ही मंडळी होती.दौलतखान, इब्राहीमखान, लायजी पाटील, तुकोजी आंग्रे,मायनाक भंडारी आदी दर्यावीर राजेंना कोकणातून मिळाले.

दर्यावीर मायनाक भंडारी हे मराठी आरमाराचे सुभेदार होते.इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपतींनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ असलेल्या खांदेरी-उंदेरी बेटांवर धाडून किल्ला बांधण्याचे ठरविले.कारण या किल्ल्यामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त होणार होते.त्याकाळी राजेंनी इंग्रजाचा धोका ओळखला होता.मायनाक भंडारी किल्ला बांधत असताना इंग्रजानी त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला.कॅप्टन विल्यम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी आदी नामांकीत सागरी सेनानींना पाठवून खांदेरी-उंदेरीला हल्ला केला.मायनाक भंडारीनी व मावळ्यांनी दिवसा युध्द व रात्री गडाची बांधणी असे दिवसरात्र काम करून मोठ्या पराक्रमाने,चिवटपणे लढून इंग्रजांचा पराभव केला व गडाची उभारणी केली.

सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारल्या गेलेल्या या जलदुर्गामुळे सिद्दी आणि इंग्रज या दोघांचीही कोंडी झाली.सिद्दीला मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखले गेले,तर मुंबईकर इंग्रजांवर मराठ्यांची टांगती तलवार राहिली.दर्यावीर मायनाक भंडारी यांचे नाव इतिहासात कायमचे अजरामर झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा