Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवरायांचे मावळे तानाजी मालुसरे.

           तानाजी मालुसरे

आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले.सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले.कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता,या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते.कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली.

रायगड जिल्ह्यातील उमरठ (पोलादपुरजवळ) गावचे असणारे तानाजी मालुसरे यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील,जावळी तालुक्यातील गोडोली होय.तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी होते.आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असलेल्या तानाजींनी,"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे" असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विढा उचलिला.

कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर राजपूत होता.त्याच्या दिमतीला १५०० हशमांची फौज होती.४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी)राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले.दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला.भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले.कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले.

किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला.किल्ल्यावर मोठी हातघाईची लढाई झाली.किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली.लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलले.

शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले.तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला,याचवेळी सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी मुख्य दरवाज्यातून प्रवेश करून निकराची लढाई करून किल्ला काबीज केला.रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला.कोंढाणा इ.स.४फेब्रुवारी,१६७०रोजी मध्यरात्री मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाण्याचे संपूर्ण युध्द हे रात्री झाले.

सभासदाच्या बखरीत या युध्दाचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता.त्याने कबूल केले की,'कोंडाणा आपण घेतो',असे कबूल करुन वस्त्रे,विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला.आणि दोघे मावळे बरे,मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले.गडावर उदेभान राजपूत होता. त्यास कळले की,गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल राजपूत कंबरकस्ता होऊन,हाती तोहा बार घेऊन,हिलाल (मशाल),चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज,बरचीवाले,चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे,महाशूर,एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. मोठे युध्द झाले,एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारें पडले. दोघे ठार झाले.

मग सुर्याजी मालूसरा(तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून,कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले.किल्ला काबीज केला.आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली,त्याचा उजेड राजियांनी राजगडाहून पाहिला आणि बोलले की,'गड घेतला,फत्ते जाली'! असे जाहालें. तों जासूद दूसरे दिवशीं वर्तमान घेऊन आला कीं,'तानाजी मालसुरा यांनी मोठे युध्द केलें.उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालसुरा पडला.' असें सांगितलें. गड फत्ते केला असें सांगताच राजें म्हणूं लागले की,'एक गड घेतला,परंतू एक गड गेला!' असे तानाजीसाठीं बहूत कष्टी जाहाले.

कोंढाणा किल्ला जिंकल्याची बातमी छत्रपतींना समजल्यानंतर अत्यंत दु:खी झालेल्या राजांनी "गड आला पण सिंह गेला" असे उद् गार काढले. त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव उमरठ या तानाजींच्या गावी पाठविले,ज्या मार्गावरून तानाजींचे शव गेले,तो मार्ग 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. आपल्या धन्याच्या वचनाला जागून किल्ला ताब्यात घेणारा तानाजी खरोखरच सिंह होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा